डोणगाव – राज्यात एलपीजी गॅस तसेच पेट्रोल-डिझेलच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हवाई पाहणी करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी २८ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, राज्यातील विविध भागांत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत असून, प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करावी. यामुळे पेट्रोल पंपांवर लागलेल्या लांबच लांब रांगा, Samruddhi Mahamarg वर उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगा, तसेच गावागावातील गॅसची कमतरता स्पष्टपणे दिसून येईल, असे त्यांनी म्हटले आहे.२७ मार्च रोजी मुंबईतून राज्यातील जनतेला पेट्रोल दरात दोन रुपयांची कपात जाहीर करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात वाढलेले दर अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे सावजी यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच वाहनधारक आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन साठवू शकत नाहीत, त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, नागरिकांना इंधन किंवा गॅस साठवणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने तात्काळ परिस्थितीची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अन्यथा जनतेत आक्रोश वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.सावजी यांनी आपल्या मागणीवर त्वरित निर्णय घेऊन राज्यभर हवाई पाहणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.





