बुलढाणा अपडेट / प्रतिनिधी : राज्यात वारंवार होत असलेल्या स्पर्धा परीक्षा व विविध शासकीय भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांवर संताप व्यक्त करत शैलेश सावजी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत सरकारला चांगलेच धारेवर धरले.स्पर्धा परीक्षांसाठी लाखो युवक-युवती रात्रंदिवस मेहनत घेत असताना, काही भ्रष्ट प्रवृत्ती आणि निष्काळजी यंत्रणेमुळे प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच बाहेर फुटत असल्याने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या सततच्या प्रकारांमुळे शासनावरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला असून, गुणवत्तेपेक्षा गैरप्रकारांना खतपाणी घालणारी व्यवस्था उभी राहत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.यावेळी शैलेश सावजी यांनी सरकारला उपरोधिक पण चपराक लावणारी सूचना करत म्हटले की, “जर सरकारला प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखता येत नसेल, तर परीक्षा घेण्याची जबाबदारी मटका आणि वरळीचा आकडा चालवणाऱ्यांकडे सोपवा. त्यांच्या व्यवस्थेत तरी आकडा आधी फुटत नाही; मात्र सरकारी परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका वारंवार फुटतात.”परीक्षा व्यवस्थेतील दोषींवर कठोर कारवाई करून प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह यंत्रणा तातडीने उभी करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील संतापाला आपल्या निवेदनातून वाचा फोडत शैलेश सावजी यांनी सरकारला थेट आरसा दाखवला असून, आता सरकार या गंभीर विषयावर कोणती ठोस भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.





