Buldhana update / मलकापुर :- शहरातील बुलढाणा–चिखली महामार्गावरील अतिक्रमणधारकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, रमाई घरकुल योजनेची लाभार्थी निवड पारदर्शक पद्धतीने करावी तसेच ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)च्या वतीने तहसीलदार, मलकापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)चे जिल्हाध्यक्ष अॅड. मनोज बागडे आणि तालुकाध्यक्ष भिवा चोपडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा–चिखली महामार्गालगत अनेक नागरिकांचे व्यवसाय व उपजीविका अवलंबून आहेत. अतिक्रमण हटविण्यापूर्वी संबंधित नागरिकांचे सर्वेक्षण करून पात्र अतिक्रमणधारकांना शासनाच्या नियमानुसार पर्यायी जागा किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.रमाई घरकुल योजनेतील लाभार्थी निवडीत पारदर्शकता ठेवण्याची मागणीही करण्यात आली. पात्र व गरजू नागरिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करूनच लाभार्थी निवड करावी तसेच कोणताही गैरप्रकार किंवा पक्षपात होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.तसेच ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झाले असून प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहणी करून पात्र नागरिकांना शासन नियमानुसार मदत द्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय द्यावा, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे ता. अध्यक्ष भिवा चोपडे,शहर अध्यक्ष अशोक भालशंकर,ता. उपाध्यक्ष मुख्तार खान, समाधान पवार, गोपाळ चव्हाण हे उपस्थित होते





