डोणगाव परिसरात सामाजिक बांधिलकी जपत, विधवा व अल्पभूधारक शेतकरी महिलांसाठी एक अत्यंत स्तुत्य आणि भावनिक उपक्रम राबविण्यात येत आहे. शैलेश सावजी यांच्या पुढाकारातून या महिलांना शेतीसाठी मोफत नांगरणी करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गरजू कुटुंबांसाठी हा उपक्रम आशेचा किरण ठरत आहे.या उपक्रमाअंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या शेतजमिनीवर कोणताही आर्थिक भार न टाकता सुमारे १ हेक्टर (२.५ एकर) क्षेत्रावर मोफत नांगरणी करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण उपक्रम स्वतःच्या खर्चातून राबविला जात असून, यात ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वावर काम केले जात असल्याचे सांगण्यात येते.योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. लाभार्थी महिला ही डोणगाव परिसरातील असावी, ती अल्पभूधारक असावी तसेच तिच्याकडे नियमित उत्पन्नाचे दुसरे साधन नसावे. याशिवाय, तिची मुले शिक्षण घेत असावीत, अशी अटही ठेवण्यात आली आहे. या निकषांमुळे खऱ्या अर्थाने गरजू आणि पात्र महिलांपर्यंत मदत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.या उपक्रमामुळे अनेक विधवा महिलांच्या आयुष्यात नवी ऊर्जा निर्माण होणार असून, त्यांच्या शेतीला चालना मिळणार आहे. आर्थिक अडचणींमुळे शेती करणे कठीण झालेले अनेक कुटुंबे पुन्हा उभारी घेतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.आजच्या काळात स्वार्थाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी कार्य करणारे हात कमी होत चालले आहेत. अशा परिस्थितीत शैलेश सावजी यांनी पुढे येत उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी असून, समाजात सकारात्मक बदल घडविणारे ठरत आहे. गरीब, गरजू आणि विशेषतः विधवा महिलांसाठी उभा राहिलेला हा ‘मदतीचा हात’ खऱ्या अर्थाने माणुसकीची जाणीव करून देणारा आहे.





