Buldhana update डोणगांव: महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवणारे एक आगळेवेगळे पत्र समोर आले आहे. माजी राज्यमंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना पत्र लिहून अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या रक्ताचा वापर शासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर करण्याची आगळी मागणी केली आहे. सावजी यांनी पत्रात तुकाराम मुंडे यांना “कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि भ्रष्टाचाराविरोधात लढणारे अधिकारी” असे संबोधत त्यांच्या कार्यशैलीचे जोरदार कौतुक केले आहे. राज्यातील अनेक अधिकारी भ्रष्टाचार आणि गैरकारभारात अडकले असून त्यांच्यात प्रामाणिकपणाचा संचार व्हावा यासाठी मुंडे यांच्या रक्ताचे प्रतीकात्मक “संक्रमण” करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्रातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे, “तुकाराम मुंडे यांच्या शरीरातील एक बाटली रक्त काढून ते शासनातील सर्व खाबूगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडे थोडे देण्यात यावे,” अशी मागणी. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये काम करण्याची प्रेरणा निर्माण होईल आणि प्रशासन अधिक कार्यक्षम बनेल, असा दावा सावजी यांनी केला आहे. सावजी यांनी मुख्य सचिवांकडे या मागणीवर तातडीने कारवाई करण्याची विनंती केली असून केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्याची मागणीही केली आहे. या अनोख्या पत्रामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.





