बुलढाणा अपडेट/प्रतिनिधी : राज्यात वारंवार घडणाऱ्या स्पर्धा परीक्षा व विविध शासकीय भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त करत शैलेश सावजी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना दिलेल्या निवेदनातून त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेल्या कथित खेळावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली.स्पर्धा परीक्षांसाठी लाखो युवक-युवती रात्रंदिवस मेहनत घेत असताना, काही भ्रष्ट प्रवृत्ती आणि निष्काळजी यंत्रणेमुळे प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच बाहेर फुटत असल्याचा आरोप सावजी यांनी केला. या सततच्या घटनांमुळे शासनावरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत होत असून, गुणवत्तेपेक्षा गैरप्रकारांना खतपाणी घालणारी व्यवस्था निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.यावेळी सरकारवर उपरोधिक शब्दांत निशाणा साधताना शैलेश सावजी म्हणाले, “जर सरकारला प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखता येत नसेल, तर परीक्षा घेण्याची जबाबदारी मटका आणि वरळीचा आकडा चालवणाऱ्यांकडे द्या. त्यांच्या व्यवस्थेत तरी आकडा आधी फुटत नाही; मात्र सरकारी परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका वारंवार फुटतात.” परीक्षा व्यवस्थेतील दोषींवर कठोर कारवाई करून प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह यंत्रणा तातडीने उभी करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील संतापाला आपल्या निवेदनातून वाचा फोडत शैलेश सावजी यांनी सरकारला थेट आरसा दाखवला आहे. आता या गंभीर विषयावर राज्य सरकार कोणती ठोस भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.





