- बुलढाणा अपडेट/अनिल राठोड डोणगाव मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुक परिसरात वन्य प्राण्यांनी पिकांची मोठी नासधूस सुरू केली असून, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. डोंगरालगत असलेल्या शेतीमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने शेती करावी कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मोहना बुद्रुक येथील शेतकरी मोहन चव्हाण यांची गट क्रमांक २०२ आणि २०३ मध्ये शेती आहे. ही शेती डोंगर पट्ट्याला लागून असल्यामुळे येथे सतत वन्य प्राण्यांचा उपद्रव असतो. यावर्षी त्यांनी मोठ्या आशेने पाच एकर क्षेत्रात हरभरा पेरला होता. मात्र, त्यापैकी दोन ते अडीच एकर वन्य प्राण्यांनी या उभ्या पिकाचा फस्त करून पूर्णपणे नुकसान केले आहे.
विशेष म्हणजे, वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी चव्हाण यांनी आपल्या शेताला ‘झटका मशीन’ (सौर कुंपण) लावले होते. तरीही वन्य प्राण्यांनी या अडथळ्यांना न जुमानता शेतात प्रवेश केला आणि काढणीस आलेला हरभरा खाऊन फस्त केला.
यापूर्वी याच शेतात तुरीचे पीक होते. मात्र, वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे आणि इतर कारणांमुळे ते पीक मोडून चव्हाण यांनी हरभरा पेरला होता. आता हरभरा पीकही हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
“डोंगराच्या कडेला शेती असल्याने नेहमीच वन्य प्राण्यांचा धाक असतो. इतका खर्च करून आणि सुरक्षा लावूनही जर पीक वाचत नसेल, तर आम्ही जगायचे कसे?”
— पीडित शेतकरी, मोहना बुद्रुक
या प्रकरणी वन विभागाने तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करावा आणि संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.





