सरकारचे दावे एकीकडे, शेतकऱ्यांची फरफट दुसरीकडे
डोणगाव : “देश प्रगती करतोय, शेती आधुनिक होतेय” अशा घोषणा सातत्याने केल्या जात असल्या तरी वास्तव मात्र याच्या अगदी उलट असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे शेतकरी विनायकराव टाले यांच्यावर चक्क बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून तो पेट्रोल पंपापर्यंत ओढत नेण्याची नामुष्की ओढवली. या घटनेने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. नांगरणी, मशागत, पेरणीपूर्व कामे यासाठी ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांचे प्रमुख साधन बनले आहे. मात्र डिझेल उपलब्ध नसल्याने अनेक ट्रॅक्टर जागेवरच बंद पडत आहेत. अशाच प्रकारे डोणगाव परिसरातील शेतकरी विनायकराव टाले यांचा ट्रॅक्टर डिझेलअभावी बंद पडल्याने बैलजोडीच्या मदतीने तो पेट्रोल पंपापर्यंत नेण्याची वेळ आली. एकीकडे शासनाकडून डिझेल-पेट्रोलचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे शेतकरी मात्र इंधनासाठी वणवण भटकताना दिसत आहेत. शेतीची अत्यंत महत्त्वाची कामे तोंडावर असताना निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. “बळीराजा” हे नावापुरतेच उरले असून प्रत्यक्षात मात्र तो संकटांच्या विळख्यात अडकला आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, कधी उत्पादनाला भाव नाही आणि आता डिझेल टंचाईमुळे शेतीची कामे खोळंबण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी विनायकराव टाले यांच्यावर ओढवलेली ही परिस्थिती ग्रामीण भागातील इंधन टंचाईचे विदारक वास्तव अधोरेखित करणारी आहे. ग्रामीण भागातील इंधन पुरवठा तातडीने सुरळीत करून शेतकऱ्यांची होणारी फरफट थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





