बुलढाणा अपडेट/अनिल राठोड, डोणगाव : वसंत ऋतूच्या आगमनासोबतच निसर्गाच्या कुशीत वसलेल्या बंजारा तांड्यांमध्ये सध्या होळीच्या उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बंजारा समाजात होळी हा केवळ रंगांचा सण नसून, ती एक प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि निसर्गपूजेचा अद्भूत सोहळा मानला जातो.
सध्या मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी, जनुना, राजगड, विश्वी, बेलगाव, देऊगाव साखरसा, पाथर्डी, पारखेड, मांडवा, मोहना बु., पारडी, हिवरा खुर्द घाटनांद्रा गोमेधर आणि उटी या तांड्यांमध्ये बंजारा बांधव मोठ्या उत्साहात होळी साजरी करत आहेत.
दिवाळीसारखाच मोठा उत्सव
बंजारा बांधवांसाठी होळी हा सण दिवाळीइतकाच महत्त्वाचा मानला जातो. फाल्गुन महिन्याच्या सुरुवातीपासूनच तांड्यांमध्ये ‘लेंगी’ “माहुरेन चाल मारे सोबतेम राणी “गीतांचा आणि नृत्याचा आवाज गुंजू लागतो. होळीच्या दिवशी तांड्यातील नायक आणि कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक वेशभूषेत सर्व बांधव एकत्र येतात. या सणात सामाजिक एकता, बंधुभाव आणि प्रेम वृद्धिंगत करण्यावर विशेष भर दिला जातो.
पळसाच्या फुलांची ‘इको-फ्रेंडली’ परंपरा
बंजारा संस्कृती निसर्गाशी घट्ट जोडलेली असल्याने, येथे रासायनिक रंगांना फाटा दिला जातो. त्याऐवजी नैसर्गिक पळसाच्या (केसुला) फुलांचा वापर केला जातो. पळसाची फुले रात्रभर पाण्यात भिजवून त्यापासून तयार केलेला केशरी रंगाचा सुगंधी ‘केसुला रंग’ होळी खेळण्यासाठी वापरतात. हा रंग त्वचेसाठी सुरक्षित आणि थंड असतो.आयुर्वेदानुसार पळसाच्या फुलांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, जे उन्हाळ्याच्या सुरुवातीला होणाऱ्या त्वचेच्या आजारांपासून संरक्षण देतात. तांड्यातील तरुण पारंपारिक वेशभूषा करून लेंगी नृत्यात दंग होतात. आजच्या काळात जिथे रासायनिक रंगांनी सणाचे स्वरूप बदलले आहे, तिथे बंजारा समाजाने पळसाच्या फुलांची नैसर्गिक परंपरा जपत जगासमोर एक आदर्श ठेवला आहे.





