Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै) मेहकर येथील जिजामाता कन्या शाळेत घडली. वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या शेकडो परीक्षार्थ्यांना मात्र परीक्षा देण्याऐवजी तासन्तास वीज येण्याची वाट पाहावी लागली. महावितरणच्या भोंगळ आणि बेजबाबदार कारभाराचा फटका थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याला बसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिजामाता कन्या शाळेत टंकलेखनाच्या परीक्षा सुरू आहेत. आज सकाळी आठ वाजता नियोजित वेळेनुसार परीक्षा सुरू झाली. मात्र, काही वेळातच शाळेचा विद्युत पुरवठा खंडित झाला आणि संपूर्ण परीक्षा प्रक्रियेलाच ब्रेक लागला. यामुळे परीक्षार्थी मानसिक तणावाखाली गेले.या प्रकाराची माहिती महावितरणच्या उपविभागीय अभियंता कळसकर यांना देण्यात आली. त्यानंतर तब्बल अर्धा ते पाऊण तासांनी वीजपुरवठा सुरू झाला; मात्र काही मिनिटांतच तो पुन्हा खंडित झाला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.महिनोनमहिने मेहनत घेऊन, भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना महावितरणच्या निष्काळजीपणाची शिक्षा का भोगावी लागत आहे? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असे संतप्त प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा महावितरणला स्वतःची जबाबदारी महत्त्वाची वाटत नाही का? परीक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील दिवशी अखंडित वीजपुरवठा ठेवण्यात अपयश येणे ही केवळ तांत्रिक अडचण नसून नियोजनशून्यता आणि प्रशासनातील गंभीर हलगर्जीपणाचे द्योतक आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच परीक्षार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची तातडीने खात्री द्यावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून होत आहे.





