बुलढाणा अपडेट प्रतिनिधी अनिल राठोड डोणगाव दि ६ मार्च२०२६ रोजी
भक्ती, शक्ती आणि जिद्दीचा संगम नुकताच डोणगाव येथे पाहायला मिळाला. येथील रहिवासी गणेश राजाराम पांडव आणि त्यांच्या पत्नी सौ. सुमन गणेश पांडव यांनी अत्यंत कठीण आणि तितकीच पवित्र मानली जाणारी ‘नर्मदा परिक्रमा’ यशस्वीरीत्या पूर्ण केली. प्रदीर्घ कालावधीनंतर हे दांपत्य स्वगृही परतताच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नर्मदा परिक्रमा ही हिंदू धर्मातील सर्वात कठीण पदयात्रांपैकी एक मानली जाते. हजारो किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करून गावात आगमन होताच संपूर्ण डोणगाव भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले होते. पांडव दांपत्याच्या सन्मानार्थ गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ‘नर्मदे हर’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता.ग्रामस्थांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून या दांपत्याचे स्वागत केले. अनेक भाविकांनी त्यांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. “पांडव दांपत्याने पूर्ण केलेली ही परिक्रमा आमच्या गावासाठी अभिमानास्पद बाब असून, त्यांच्या या धार्मिक कार्यामुळे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.





