बुलढाणा अपडेट / डोणगांव प्रतिनिधी अनिल राठोड मेहकररात्रंदिवस काबाडकष्ट करून मुलाप्रमाणे जोपासलेले गव्हाचे पीक डोळ्यादेखत जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना मेहकर तालुक्यातील साब्रा शिवारात घडली. महावितरणच्या लोंबकळणाऱ्या वीज तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतकरी लक्ष्मण तुकाराम वानखेडे यांचा एक एकर गहू पूर्णपणे जळून खाक झाला आहे. ५ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.लक्ष्मण वानखेडे यांच्या शेतातून विजेची उच्चदाब वाहिनी गेली आहे. येथील विद्युत तारा बऱ्याच दिवसांपासून सैल होऊन लोंबकळत होत्या. गुरुवारी सकाळी वाऱ्याचा वेग वाढल्याने या तारांमध्ये जोरदार घर्षण झाले आणि त्यातून पडलेल्या ठिणग्या थेट वाळलेल्या गव्हाच्या पिकात पडल्या. गव्हाने क्षणार्धात पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले आगीचे लोळ दिसताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारीच इतर शेतकऱ्यांचे गहू आणि हरभऱ्याचे पीक कापणीला आले होते. आग पसरण्याची भीती असतानाच, शेतकऱ्यांनी तातडीने शेतातील वीजपंप सुरू करून पाण्याचा मारा केला. मोठ्या शर्थीनंतर आग आटोक्यात आली, ज्यामुळे शेजारील पिकांचे नुकसान टळले. मात्र, वानखेडे यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळेच ही आग लागल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. लोंबकळणाऱ्या तारांबाबत तक्रार करूनही दुरुस्ती न झाल्याने ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून पीडित शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी साब्रा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.





