बुलढाणा अपडेट/(जि. प्रतिनिधी):
इयत्ता 12वीच्या परीक्षेदरम्यान वाशिम जिल्ह्यात सामूहिक कॉपी प्रकरण उघडकीस आणून मोठा गैरप्रकार रोखणाऱ्या भरारी पथकाचे सर्वत्र कौतुक होत असून, या पथकाचा शासनस्तरावर सन्मान करण्यात यावा, अशी ठाम मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे शिक्षणमंत्री श्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाशिम जिल्ह्यातील श्री सेवागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय (टो-जुमडा फाटा) या परीक्षा केंद्रावर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजता भरारी पथकाने अचानक भेट दिली असता ५८१ विद्यार्थ्यांना सामूहिक कॉपी करताना पकडण्यात आले. तसेच या प्रकरणात सहकार्य करणाऱ्या २६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रात भविष्यातील पिढी घडत असते. मात्र अशा प्रकारच्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येते. अशा परिस्थितीत भरारी पथकाने धाडसी पाऊल उचलत मोठा भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न केला, म्हणून या पथकाचा मान-सन्मान शासनस्तरावर होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, “शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा धाडसी कारवाईला प्रोत्साहन मिळाले पाहिजे,” अशी अपेक्षा व्यक्त करत सुबोध सावजी यांनी ही मागणी मान्य करण्याचे आवाहन केले आहे.





